आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणी:मुलांचं हरवलेलं बालपण

अर्चना देशपांडे-पोळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श र्विल, काय चाललंय काय तुझं? त्याचा रिझल्ट पाहता पाहता अनया वैतागली होती.. बघ ना गं, एकाही विषयात धड मार्क नाहीत. भाषा विषयाची तर बोंबच आहे.. वाचायला नको.. लिहिण्याचा कंटाळा.. मोबाइल द्या हातात.. तासन्् तास चालतील बोटं त्यावर.. अनयाचं बोलणं ऐकता ऐकता मी विचारात पडले. खरंच किती आहारी गेलोत ना आपण या तंत्रज्ञानाच्या.. हा विचार करता करता मन बालपणात गेलं.. किती छान, सुंदर होतं आपलं बालपण.. किती छान वाटायच्या सुट्ट्या.. प्रत्येक सुट्टीत काहीतरी नवीन शिकणं व्हायचं.. आत्ताच्या मुलांसारखा कंटाळा नव्हता. संध्याकाळची प्रार्थना मन शांत करायची. आजीच्या गोष्टी ऐकता ऐकता गाढ झोप लागायची. आईला मदत करता करता काहीतरी शिकणं व्हायचं. शाळेत रोज सुविचार सांगायची धडपड असायची. सुंदर अक्षर काढण्याची तर स्पर्धाच असायची. खेळातही गंमत असायची अन् वाचनातही मजा वाटायची. सुट्टीत नवीन काय वाचलं, हे सांगायची उत्सुकता वेगळीच होती. परिकथांमध्ये मन रमायचं. बालगीतांवर पाय ताल धरायचे.खूप गंमत होती त्या बालपणात. आज हे सारं हरवलंय. आजच्या मुलांचं विश्वच बदललंय.. सोशल मीडिया, ऑनलाइन गेम्स यांनी मुलांच्या आयुष्याचा खेळखंडोबा करून ठेवलाय नुसता.. थालीपीठ, पोह्यांची जागा पिझ्झा-बर्गरने केव्हाच बळकावलीय. त्यामुळे तब्येतीच्या तक्रारी वाढतायत. रेडी टू ईटच्या जमान्यात आई पण हरवलीय. संध्याकाळी मुलांसोबत गप्पा मारणारे बाबा शेअर मार्केटमध्ये बिझी झालेत. घराघरातील मोठ्या होम थिएटरमध्ये गप्पागोष्टी लुप्त झाल्यात. आता सुट्टी लागली की हे क्लासेस, ते कॅम्प अशात मुलं मनमुराद हसणं, नाचणं विसरलीयत. गाण्याच्या भेंड्या, कॅरमचा कट्टा, बुद्धिबळाच्या सोंगट्या, चित्रातले रंगही हरवून गेलेत. सगळीकडे नुसती स्पर्धा. सतत हव्यास काहीतरी मिळवण्याचा. शाळेत मार्कांची स्पर्धा, बाहेर क्लासेसची स्पर्धा.. बरं, हे नाही करावं तरीही तोटा‌. आणि हे सगळं करून हातात पडतंय काय? निखळ, निर्व्याज आनंदाला ही मुलं मुकताहेत, असं नाही का वाटंत? पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही. पुस्तकं आयुष्य समृद्ध करतात, विचारांना दिशा देतात. मुक्यांना बोलतं करतात अन् हातांना लिहितं करतात. सगळ्यांनाच लेखन जमतं असं नाही, पण पुस्तकं मनावर खोलवर परिणाम करतात, हे या मुलांना पटवून देणं खूप गरजेचं आहे. चला, तंत्रज्ञानासोबत चालता चालता पुस्तकांचा हात धरूया. चांगलं वाचूया.. समृद्ध होऊया.. लिहितं होऊया.. {संपर्क : ८४८४८५३४१८