आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय राजकारणात यात्रांना मोठे महत्त्व राहिले आहे. मात्र याचा एक दु:खद पैलू असा की, त्यातून विशेष काही निष्पन्न झाले नाही. २०२२ मध्येही काहीसे असेच होताना दिसत आहे, राहुल गांधींना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेला पर्सनॅलिटी कल्ट त्यांच्या पक्षाच्या अजेंड्यालाच पडद्यामागे टाकत आहे. राहुल त्यांची भारत जोडो यात्रा गांधीवादी शैलीत अंतरात्म्याच्या आवाजावर काढत आहेत. १९९८-२००४ पर्यंत सोनिया गांधींनी पक्षाचा पाया मजबूत केला होता आणि सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडली होती. यामुळे २००४ आणि २००९ मध्ये काँग्रेसला केंद्रात सत्ता मिळाली होती. आता मात्र त्यांच्या कष्टावर पाणी फिरवले जात आहे.
एक भारत यात्रा चंद्रशेखर यांनीही १९८३ मध्ये काढली होती. राहुल गांधींच्या यात्रेसारखीच तिचाही प्रारंभ कन्याकुमारीहून झाला होता. तिला थोडे-फार कव्हरेजही मिळाले होते, मात्र कुणालाच पूर्ण माहिती नव्हते की, ती यात्रा कशासाठी काढली. १९८४ च्या निवडणुकीत चंद्रशेखर यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला, त्याचेे मुख्य कारण इंदिरा गांधींच्या हत्येमुळे निर्माण झालेली सहानुभूतीची लाट होती. १९९०-९१ मध्ये लालकृष्ण अडवाणींनी राम मंदिर आंदोलनात रथयात्रा आणि मुरली मनोहर जोशींनी फुटीरतावादाच्या विरोधात एकता यात्रा काढली होती. अनेक विश्लेषकांचे मत आहे की, या यात्रांमुळे भाजपला मजबुती मिळाली, मात्र सत्य असे की, १९८९ ते १९९२ पर्यंत भारतीय राजकारणात अनेक घटना घडल्या होत्या, त्यांचे महत्त्व या यात्रांपेक्षा जास्त होते. यात महत्त्वाचे होते, काश्मिरी पंडितांचे हत्याकांड, मंडल आयोगानंतर काँग्रेसचा घटणारा जनाधार आणि जनता दलाची फूट, यामुळे काँग्रेसच्या मुख्य विरोधी पक्षाचा दर्जा भाजपकडे आला. राजकीय हिंदुत्वाचा उदय, काँग्रेसच्या जातीय समीकरणांचे नुकसान आणि जनता दलाच्या पतनानंतर निर्माण झालेल्या शून्यामुळेच भाजपला यश आले होते. तरीही यूपीत कल्याणसिंग यांच्यानंतर भाजपला पुन्हा सत्तेत यायला पाच वर्षे लागली होती. एक यात्रा अशी आहे, जिला यशस्वी म्हटले जाऊ शकते. ती २००३ मध्ये वाय. एस. राजशेखर रेड्डींनी ग्रामीण आंध्र प्रदेशात काढली होती. तिचा जास्त प्रचार झाला नाही. मात्र, तिच्यामुळे रेड्डी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या समस्या ऐकल्या. वास्तवात भारताच्या राजकीय यात्रांसोबत हाच विरोधाभास आहे. एक तर तुम्ही वायएसआरप्रमाणे गुपचूप यात्रा काढू शकता आणि पक्षाचा पाया मजबूत करू शकता किंवा तुम्ही खूप गदारोळ करत हायप्रोफाइल यात्रा काढू शकता, ज्या आपले उद्दिष्ट प्राप्त करण्यात अपयशी ठरल्या. भारत जोडो यात्रेसोबत राहुल गांधी हे दुसरे मॉडेल स्वीकारताना दिसतात. एक असे पब्लिसिटी मॉडेल, ज्यातून खूप काही प्राप्त होत नाही. एक तर यात्रेत राहुलने ज्या सेलिब्रिटींना आपल्या सोबत चालवले त्यांचा लोकांशी थेट संपर्क नाही. दुसरे, ते सतत सांगत राहिले की, मीडिया त्यांची यात्रा दाखवत नाही, याचा अर्थ असा निघाला की, ती महागाई व बेरोजगारीऐवजी प्रचारासाठी निघालेली यात्रा होती. तिसरे, खुद्द काँग्रेस प्रवक्त्यांचे लक्ष यात्रेच्या मुद्द्यांऐवजी यात्रेवर जास्त होते. काही यात्रेत होणाऱ्या गर्दीवर लक्ष दिले. काहींनी राहुल यांच्या धावण्याची क्षमता आणि थंडीत टी-शर्ट घालण्याची चर्चा केली, जणू काही ती त्यांचा फिटनेस दाखवण्यासाठी निघालेली होती? चाैथे, यात्रेत झालेल्या गर्दीमुळे सुरक्षा कारणांवरून राहुल सामान्यांशी खऱ्या संपर्कापासून वंचित राहिले. खरा जनसंपर्क तेव्हाच झाला असता जेव्हा मीडियाचे कॅमेरे बंद असते आणि जास्त सुरक्षा व्यवस्था नसती. मात्र, मते खोटे बोलत नाहीत, ते आपल्याला २०२३ आणि २०२४ च्या निवडणुकांमधून कळेलच. ही यात्रा वायएसआरच्या यात्रेसारखी यशस्वी व्हावी अशी अपेक्षा काँग्रेसची असेल. मात्र असेही होऊ शकते की, भूतकाळातील यात्रांसारखी तिचा हेतू प्राप्त करण्यात अपयशी सिद्ध होईल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
अभिजित अय्यर मित्रा सीनियर फेलो, आयपीसीएस abhijit@ipcs.org
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.