आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या लंडन दौऱ्यात भारतीय लोकशाहीचे ज्या प्रकारे अवमूल्यन केले त्यामुळे भाजप समर्थक संतप्त झाले आहेत. खरे त्यांनी खुश व्हायला पाहिजे. कारण राहुल आणि काँग्रेस जितके मजबूत होतील तितका संयुक्त विरोधी पक्ष कमकुवत होईल. हा विरोधाभास कसा समजून घ्यावा? याचे कारण आज देशातील विरोधक विभागले गेले आहेत. एका बाजूला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए, त्यांचे जुने मित्रपक्ष, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, एमके स्टॅलिन यांचा द्रमुक आणि सीताराम येचुरी यांचा सीपीआय-एम. त्यांना २०२४ मध्ये राहुल यांना महाआघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाहायचे आहे. दुसरीकडे, ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्यासारखे महत्त्वाकांक्षी प्रादेशिक नेते राहुल यांना विरोध करणारे आहेत. जगनमोहन रेड्डी, नवीन पटनायक, अखिलेश यादव यांसारख्या काही लोकांनी अद्याप त्यांचे कार्ड उघडलेले नाही आणि त्यांची जमीन वाचवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आपली शक्यता बिघडवू शकते, अशी भीती या सर्वांना वाटत आहे. आणि याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. याचे कारण राहुल हे राष्ट्रीय नेते म्हणून जेवढे बलाढ्य होतील, तेवढाच विरोधी ऐक्याचा निर्देशांक कमकुवत होईल. राहुल ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्याशी सहमत होण्याची शक्यता कमी आहे. २०२४ च्या निवडणुका जिंकायच्या असतील तर विरोधकांना एकत्र यावे लागेल, पण मोदींना आव्हान देणारा राहुल यांचा उदय विरोधकांना एकत्र करणार नाही, तर त्यांच्यात फूट पाडेल. तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांचे उदाहरण घ्या. ते दोन्ही बाजूंनी खेळत आहेत. गेली चार वर्षे ते काँग्रेसचे कडवे टीकाकार आहेत, पण त्यांच्या मुलीवर ईडीने केलेल्या आरोपानंतर त्यांनी अल्पकाळ का होईना काँग्रेसशी समेट करणे चांगले मानले. ज्या दारू घोटाळ्यात त्यांची मुलगी कविता हिचे नाव पुढे आले आहे, त्याच्या तारा आम आदमी पार्टीशी जोडल्या गेल्या आहेत, अशा परिस्थितीत त्यांना आता आम आदमी पक्षाचा प्रतिस्पर्धी काँग्रेसची मदत घेण्याची गरज भासू लागली आहे. कविता यांनी ज्या पद्धतीने संसदेत महिला आरक्षण विधेयकावर सोनिया गांधींना सहकार्य करण्याचा प्रस्ताव मांडला, त्यावरून या दिशेने संकेत मिळतात. तेलंगणात केसीआर यांची काँग्रेस पक्षाशी थेट टक्कर असताना ही परिस्थिती आहे. २०२४ च्या निवडणुकीचे महत्त्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजले आहे. त्यामुळेच त्याच्या तयारीसाठी त्यांनी देशभरात जवळपास शंभर रॅल्या काढण्याची तयारी केली आहे. या सार्वत्रिक निवडणुका ऐतिहासिक ठरणार आहेत, कारण मोदी जिंकले तर जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून येणारे ते दुसरे नेते ठरतील. नेहरूंनी १९५२, १९५७ आणि १९६२ मध्ये निवडणुका जिंकल्या, पण तिसरा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. इंदिरा गांधीही तीन वेळा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या, पण त्या सलग तीन वेळा पंतप्रधान झाल्या नाहीत. १९६७ आणि १९७१ मध्ये पंतप्रधान म्हणून निवडून आल्यानंतर १९७७ मध्ये त्या निवडणुकीत पराभूत झाल्या. त्यानंतर १९८० मध्ये पंतप्रधान झाल्या. गांधी कुटुंब आणि इतर प्रादेशिक सत्ताधाऱ्यांसाठी चिंतेची गोष्ट म्हणजे मोदी २०२४ मध्ये जिंकले तरी त्याने त्यांच्या भविष्यातील शक्यतांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल. अनेक पक्षांचे प्रमुख आता म्हातारे होत आहेत. शरद पवार ८१ वर्षांचे झाले आहेत. २०२९ मध्ये ते ८७ वर्षांचे असतील. त्यांच्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या गटात राष्ट्रवादीत फूट पडण्याची दाट शक्यता आहे. नवीन पटनायक हेदेखील ७६ वर्षांचे असून त्यांचा उत्तराधिकारी नाही. सोनिया ७६ वर्षांच्या असून आरोग्यासंबंधी समस्यांशी झुंज देत आहेत. २०२९ मध्ये त्या ८३ वर्षांच्या होतील. राहुल आणि प्रियंका गांधी २०२९ मध्ये ६० च्या आसपास असतील. २०२४ चा पराभव त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी निराशाजनक ठरू शकतो. मोदींना पराभूत करण्यासाठी विरोधकांना महत्त्वाच्या राज्यांमध्ये त्यांचा जनाधार कमी करावा लागेल. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने अनेक मोठ्या राज्यांत काँग्रेसचा धुव्वा उडवला, तर काही राज्यांत काँग्रेसने एक वर्ष आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. भारतात पंतप्रधानपदाची निवडणूक आता अमेरिकन अध्यक्षीय शैलीत होत असून, त्यात राहुल हे मोदींसमोर प्रबळ दावेदार म्हणून उभे राहिले तर विरोधकांच्या एकजुटीवर त्याचा विपरीत परिणाम होणार, हे नक्की. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)
मिन्हाज मर्चंट लेखक, प्रकाशक आणि संपादक mmleditorial@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.