आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिया कप रद्द होण्याची शक्यता!:PAK मीडियाचा दावा- भारत पाकिस्तानशिवाय 5 देशांची स्पर्धा घेऊ शकतो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या सप्टेंबरमध्ये पाकिस्तानात होणारी आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या हवाल्याने पाकिस्तानी माध्यमांनी हा दावा केला आहे. आशिया कप रद्द झाल्यावर बीसीसीआयकडून पाच देशांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. यात पाक सोडून आशियातील इतर संघ सहभागी होऊ शकतात असाही दावा यात करण्यात आला आहे.

पाकिस्तान बोर्डाचे सूत्र म्हणाले ही अफवा

आशिया कप रद्द होण्याचे वृत्त आल्यावर दिव्य मराठी नेटवर्कने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी या मुद्द्यावर संवाद साधला. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने ही अफवा असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

वादाचे कारण जाणून घ्या

आयसीसीच्या कॅलेंडरमध्ये 2023 मध्ये होणाऱ्या आशिया कपचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. हे कॅलेंडर जारी होताच बीसीसीआयने स्पष्ट केले होते की, भारतीय संघ स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाणार नाही. बीसीसीआयने नव्या ठिकाणी आशिया कपचे आयोजन करण्यास सांगितले होते. मात्र पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे मान्य केले नाही. कारण खराब आर्थिक स्थितीतून सावरण्यासाठी त्यांना आशिया कपकडूनच आशा आहे.

तथापि, पाकने ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर घेण्याचा प्रस्तावही दिला आहे. यानुसार भारताचे सामने दुसऱ्या देशात तर उर्वरित सामने पाकिस्तानात खेळवण्याचा प्रस्ताव होता. भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचल्यास अंतिम सामनाही पाकिस्तानबाहेर खेळवण्याचा प्रस्ताव होता.

बीसीसीआयने यावर स्पष्ट विधान केले नाही. नंतर वृत्त आले की, बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलला विरोध केला आहे. यामुळे स्पर्धेचा खर्च वाढून महसूलातील हिस्सेदारी कमी होईल असे त्यांनी म्हटले होते.

जय शहा म्हणाले होते, आशिया कपवर निर्णय नाही

बीसीसीआयचे सचिव जय शहा अलिकडेच म्हणाले होते की, आशिया कपमधील भारताचे सामने पाकिस्तानऐवजी दुसऱ्या देशात खेळवण्याच्या पीसीबीच्या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. इतर देशांकडूनही त्यांचे फीडबॅक घेतले जात आहेत. त्या फीडबॅकच्या आधारेच पुढचा निर्णय घेतला जाईल.

10 वर्षांत भारत-पाकदरम्यान 15 सामने

दोन्ही देशांतील शेवटची सीरीज जानेवारी 2013 मध्ये भारतात झाली होती. पाकिस्तानने या दौऱ्यात 3 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळले होते. यानंतर दोन्ही देश मल्टिनेशन टुर्नामेंटमध्ये आमने-सामने आले होते. या 10 वर्षांत दोन्ही देशांत सर्व फॉरमॅटमधील केवळ 15 सामनेच होऊ शकले होते. यात 8 वनडे आणि 7 टी-20 सामने खेळले गेले. यात भारताने 11 आणि पाकिस्तानने 4 सामने जिंकले होते.

2016 मध्ये टी-20 वर्ल्डकपसाठी पाक संघ भारतात आला

भारतीय संघ राजकीय कारणांमुळे पाकिस्तानात सामने खेळण्यासाठी जात नाही. मात्र पाकिस्तानचा संघ 2016 मध्ये टी-20 वर्ल्डकपसाठी भारतात आला आहे. 2007 नंतर दोन्ही देशांत एकही टेस्ट मॅच झालेली नाही.